त्यानुसार, 8 तालुक्यांमधील एकाही पर्यटनस्थळी 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मागील काही दिवसात भुशी डॅम आणि ताम्हिणी घाट परिसरात घडलेल्या दुर्घटनांमध्ये 6 जणांनी आपला जीव गमावला. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन अलर्ट झालं असून पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या 8 तालुक्यांमधील गड-किल्ले, पर्यटनस्थळं, धरणं आणि धबधबे अशा पर्यटनस्थळी जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, आठही तालुक्यांमधील एकाही पर्यटनस्थळी 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
धोकादायक पर्यटनामुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी यात अनेकजण आपला जीव गमावतात. यंदा 2 दिवसांतच 2 दुर्घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी जमावबंदीचे आदेश लागू केले. वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणं, खोल पाण्यात उतरणं, त्यात पोहणं, इत्यादींवर आता बंदी असेल. तसंच धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणं, इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत हे आदेश पाळणं बंधनकारक आहे.
‘या’ठिकाणी आदेश लागू:
- मावळ : भुशी धरण आणि गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे, लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरणं, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, सहारा पूल, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर आणि लोणावळ्याच्या वन क्षेत्रातील पर्यटनस्थळांवर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर बंदी.
- मुळशी : मुळशी धरण, ताम्हिणी घाट जंगल परिसर, मिल्कीबार धबधबा.
- हवेली : खडकवासला धरण, वरसगाव धरण, सिंहगड.
- आंबेगाव : भीमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंढवळ धबधबा.
- जुन्नर : माळशेज घाट, धरणे, गडकिल्ले परिसर, शिवनेरी, माणिकडोह.
- भाटघर धरणे, गडकिल्ले कॉम्प्लेक्स, धबधबे.
- वेल्हा : धरण, गडकिल्ले कॉम्प्लेक्स, कातळधारा धबधबा.
- खेड : चासकमान धरण, भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे, जंगल परिसर.
- इंदापूर : कुंभारगाव बोटिंग क्षेत्र.