Weather Update : हवामान विभागाने दक्षिण-पश्चिम मान्सून 6 जून म्हणजेच गुरुवारी महाराष्ट्रात पोहोचल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पुढील काही दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
Weather Update : राज्यात मान्सून दाखल झाला असून हवामान खात्याकडून पुढील 5 दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचं आगमन झालं आहे.
येत्या तीन ते चार दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रतील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) तसंच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज नंदुरबार वगळता राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह आज संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार असून बळीराजाही सुखावला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि नंतर बंगालच्या खाडीमार्गे इस्लामपूरपर्यंत आला आहे. मान्सून 7-8 जूनपर्यंत मुंबईत प्रवेश करेल आणि 10 जूनपर्यंत राज्यभरात पसरेल, असा अंदाज आहे.
राज्याची राजधानी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने मुंबईत यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईत 35 अंश कमाल आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापमान असेल. दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात यंदा तापमानाने उच्चांक गाठला होता. कोकण, मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही तापमान 40 ते 45 डिग्रीपर्यंत होतं. तसंच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.